सौ. कल्पना प्रभाकर चौधरी आणि पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
माझा बळीराजा | शेतकरी कविता
काव्यबंध शब्दसमूह
काव्य लतिका कविता स्पर्धा
विषय : शेतकरी
दिनांक: 31/08/2023
शीर्षक : माझा बळीराजा

आम्ही धरतीची लेकरं
काळया मातीची चाकर
आम्ही राबतो शेतात
घाम गाळतो मातीत,
आम्ही जातीच शेतकरी
खातो कष्टाची भाकरी..
माझ्या ढवळ्या नी पवळ्याची
जोडी खिल्लारी बैलाची
शेतात दिनरात राबुनी
आपलं जीवन त्यागुनी…
घाम गाळून पिकवितो सोन
काळया मातीची राखी तो शान,
दिल देवानं आम्हाला देणं
शेती मळा आयुष्याचं धन…
रोज उन्हात आम्ही हो जळतो
कधी पाण्यातही तळमळतो,
कधी भुकेनं जीव कळवळतो
कधी घामाच रगत जाळतो…
माझा बळीराजा,कष्टतो दिन रात
कधी अतिवृष्टी,कधी कोरडा दुष्काळ,
कधी अर्धपोटी,कधी उपाशी राहून
पीक पिकवूनी करतो धान्याचा सुकाळ…
त्याच्या पिकले नाही भाव
त्याचे जीवन कवडीमोल,
साऱ्या जगाचा पोशिंदा
माझा बळीराजा अनमोल…
आम्ही धरतीची लेकरं
काळया मातीची चाकर….
स्वरचित :
सौ कल्पना प्रभाकर चौधरी. परतवाडा (अमरावती)
ऐका व्यथेचीच कविता | शेतकरी कविता
काव्यबंध समूह आयोजित गुरूवारीय काव्यलतिका स्पर्धेसाठी
दि.३१अॉगस्ट२०२३ गुरूवार
विषय- शेतकरी
शीर्षक- ऐका व्यथेचीच कथा
काव्यप्रकार-अष्टाक्षरी
ऐका व्यथेचीच कथा

शेतकरी, अन्नदाता
बळीराजा म्हणे तया
असे विश्वाचाच त्राता १
शेती निसर्ग लहरी
अतिवृष्टी, अनावृष्टी
काय करतो बिचारा
पावसाकडेच दृष्टी २
ज्याचे राबणे शेतात
होई त्यालाच फायदा
उगे हात हातावर
नसे त्याच्याशी वायदा ३
रात्रंदिन राबतोय
घाम गाळत शेतात
तेव्हा कुठे पिके शेती
पैका येतसे हातात ४
स्वतः शेतात कष्टतो
दलालांना मलिदाच
कधी लालही चिखल
असा उल्टा कायदाच ५
समस्यांचा रात्रंदिन
करी सतत सामना
नसे मदतीचा भाव
येत कोणाच्याही मना ६
बैलजोडी सर्जाराजा
फोडापरी जपतसे
मनी भूतदया त्याच्या
मनोमनी वसतसे ७
गाय वासरे बकरी
मुलांसम सांभाळतो
पशुप्रेम मनामध्ये
सदा तोचही ठेवतो ८
द्यावा हात किसानाला
नको कोरडीच माया
व्हावे द्रवित ते मन
उंचावणे त्याचा पाया ९
कास्तकार म्हणे मनी
मीच अभागी हो सदा
येती नेहमी समोर
बहू रूपात आपदा १०
नको जिणं वाटे त्याला
दुःख दिसे आसपास
येई मनात विचार
जिण्यासम बरा फास ११
आता थोडे बदलावे
काळासम ते चलावे
शेती पिकते ते नको
हाटी विकते पेरावे १२
✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर.

शेतकरी कविता
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह